संगमनेर : थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम तालुक्याचे हृदय म्हणून काम करताना सभासद शेतकरी ऊस उत्पादक यांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. ऊस हे शाश्वत पीक असल्याने कार्यक्षेत्रात शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी असे आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2026 – 27 या गळीत हंगामाच्या मिल रोलर प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे, व्हा.चेअरमन पांडुरंग पा.घुले,युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ.जयश्रीताई थोरात, बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, हौशीराम सोनवणे, कारखान्याचे संचालक संपतराव गोडगे, सतीश वर्पे, विलास शिंदे, रामनाथ कुटे, विजय राहणे, गुलाबराव देशमुख,अरुण वाकचौरे,अंकुश ताजणे,मदन आंबरे, सौ. लताताई गायकर, सौ.सुंदराबाई दुबे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे, कृष्णा दिघे,अशोक मुटकुळे,नवनाथ गडाख,संजय पाटील,भारत देशमुख,रामदास तांबडे आदींसह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.यावेळी बोलताना मा.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, ऊस हे शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पादन देणारे पीक आहे. कार्यक्षेत्रामध्ये जास्तीत जास्त ऊस लागवड होण्यासाठी कृषी विभागाने काम केले पाहिजे याचबरोबर एकरी शंभर टन उत्पादन मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी अत्याधुनिक पद्धतीचा वापर करावा असे आवाहन करताना साखर कारखान्याची वाटचाल ही अत्यंत आदर्श तत्त्वांवर सुरू आहे. आपल्या कारखान्याने कायम चांगला भाव दिला आहे. शेतकरी, सभासद, ऊस उत्पादक, कामगार यांचे हित जोपासले आहे.राज्यभरात अनेक सहकारी कारखान्यांमधून अल्कोहोल मधून दारूची निर्मिती केली जाते. मात्र सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्तीत आणि विचारांवर या कारखान्याचे कामकाज सुरू असून थोरात सहकारी साखर कारखान्यात दारू न बनवता इंडस्ट्रियल अल्कोहोल निर्माण केले जाते.वीज निर्मिती आणि इथेनॉल प्रकल्प हे कारखान्याला मोठी मदत करत आहेत. चालू हंगामात कारखान्याने 1 कोटी 40 लाख लिटर इथेनॉल निर्माण केले आहे. आता इथेनॉल चे महत्व जगाला कळाले आहे. युद्धामुळे जगाला आणि आपल्या देशालाही इंधनाचा तुटवडा भासत आहे. याला इथेनॉल हा महत्त्वाचा पर्याय आहे. जास्त इथेनॉल व वीज निर्मिती करता जास्त ऊस गाळप होणे गरजेचे आहे याकरता शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी असे आवाहन केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले.तर व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी आभार मानले. यावेळी कार्यकर्ते,पदाधिकारी व कारखान्याचे अधिकारी,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
थोरात सह.साखर कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन







