मुंबई – जाती धर्म प्रांत भाषे पेक्षा राष्ट्र श्रेष्ठ आहे.आपण प्रथम भारतीय आहोत आणि शेवटीही भारतीय आहोत अशी राष्ट्रप्रेमाचे शिकवण महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिली.त्यांचे संविधानातील समतावादी भारत उभा करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची आपली जबाबदारी आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज केले.चैत्यभूमी येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त ना. रामदास आठवले यांनी सहकुटुंब महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केले.त्यानंतर पत्रकारांशी ना. रामदास आठवले यांनी संवाद साधला.यावेळी सौ.सीमाताई आठवले; जीत आठवले; रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे ; नागसेन कांबळे; सचिनभाई मोहिते; दयाल बहादुर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष आपण देशभर पोहोचवला आहे.देशात सर्व राज्यात रिपब्लिकन पक्ष पोहोचवला आहे. देशपातळीवर एकच व्यापक मोठा मजबूत रिपब्लिकन पक्ष असला पाहिजे.त्यासाठी रिपब्लिकन गटबाजी संपली पाहिजे .रिपब्लिकन ऐक्य झाले पाहिजे अशी भूमिका ना. रामदास आठवले यांनी मांडली.
अनुसूचित जाती उपवर्गीकरण बाबत आपण व्यापक भूमिका घेतली पाहिजे.सर्व जातीना न्याय मिळाला पाहिजे.याबाबत नियुक्त समितीने राज्यातील नेत्यांशी चर्चा केली पाहिजे.जनतेची मते याबाबत जाणून घेतली पाहिजे.तसेच राज्यसरकार ने याबाबत चा अहवाल खुला केला पाहिजे. बौद्धांनी जशी शैक्षणिक प्रगती केली तशी अनुसूचित जातीतील अन्य जातींनी ही शिक्षणात प्रगती केली पाहिजे उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे नुकसान होणार याची खबरदारी घ्यावी असे मत ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रप्रेमाची शिकवण दिली – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले







