एकोपा व तरुणांच्या नियोजनाने यात्रा ठरली आदर्श
श्रीरामपूर : तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र उंबरगाव येथे चैत्र कृष्ण कालाष्टमीच्या मुहूर्तावर श्री कालभैरवनाथ देवस्थानची यात्रा उत्साहात पार पडली. संपूर्ण गावाने एकत्र येत गुण्यागोविंदाने आणि पारंपरिक पद्धतीने ही यात्रा साजरी केली.
यात्रेत नियोजनबद्ध तयारी व तरुण पिढीचा सहभाग दिसून आला. यात्रेनिमित्त गावातील तरुणांनी एकत्र येत मंदिर परिसराची स्वच्छता व रंगरंगोटी केली. या कार्यासाठी गावकरी व भक्तांनी सढळ हाताने आर्थिक मदत केली. ग्रामस्थांनी बैठकी घेऊन केलेल्या नियोजनामुळे यात्रेला शिस्तबद्ध स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी पालखीचे मानकरी बाळासाहेब मुंगसे यांचा गौरव करण्यात आला. श्री. मुंगसे हे दररोज मंदिरात येऊन नित्यनियमाने साफसफाईची सेवा करतात. त्यांच्या या निस्वार्थी सेवेचा गौरव यावेळी करण्यात आला.
यात्रेनिमित्त विविध प्रकारची दुकाने थाटली होती. यात्रेत पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने कुटूंबासह सहभागी झाले होते. यात्रा यशस्वीतेसाठी ग्रामस्थ, तरुण मंडळ व भाविकांनी परिश्रम घेतले.







