नेवासा : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध समस्यांकडे वेळेत लक्ष देणे आवश्यक असून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी नागरपंचायतीने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. विशेषतः वीज वाहिन्यांच्या तारा झाडांच्या फांद्यांमध्ये अडकून डॅमेज होण्याची शक्यता वाढत असल्याने दुर्घटना घडण्याचा धोका निर्माण झाला आहे.नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पावसाळा सुरू होण्याच्या किमान एक महिना आधी झाडांच्या वाढलेल्या फांद्या कट करणे गरजेचे आहे. वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तारांवर पडून वीजपुरवठा खंडित होणे, शॉर्टसर्किट होणे तसेच जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरपंचायतीने व संबंधित विभागांनी समन्वय साधून ही कामे वेळेत पूर्ण करावीत, अशी मागणी होत आहे.तसेच शहरातील चेंबर व गटारींची साफसफाई पावसाळ्यापूर्वीच करण्यात यावी, अन्यथा चेंबर ब्लॉक होऊन पाणी साचण्याची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे नागरिकांना दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्याच्या समस्या सहन कराव्या लागू शकतात. नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी नागरपंचायतीने नियमित स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.दरम्यान, पावसाळ्यात डासांची वाढ होण्यापूर्वीच शहरात फवारणी करण्यात यावी, अशीही मागणी नागरिकांकडून होत आहे. वेळेत फवारणी झाल्यास डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व आरोग्यासाठी नागरपंचायतीने या सर्व बाबींकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पावसाळ्यापूर्वी नागरपंचायतीने जागे व्हावे; नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर







