- शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाचे तहसीलदारांना निवेदन
श्रीरामपूर : साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची थकीत असलेली एफआरपीची रक्कम कारखान्यांना न देता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करावी अशी मागणी शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष निलेश शेडगे यांनी केली आहे. श्री. शेडगे यांनी प्रसिध्दि पञकात म्हटले आहे की, साखर कारखान्यांनी शासनाकडे प्रतिटन ५००रु. अर्थसहाय्याची मागणी केली आहे. या प्रस्तावासाठी शासनाने समिती गठीत केली आहे. या समितीने शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींच्या मताचाही विचार करावा, अशी मागणी केली आहे. कारखान्यांना सरसकट प्रतिटन ५००रु.अनुदान न देता कारखानानिहाय थकीत एफआरपीच्या रकमे इतकेच अर्थसहाय्य करावे. तसेच सदर अर्थसहाय्याचा गैरवापर होवू नये यासाठी शासनाने कारखानानिहाय थकीत एफआरपी असलेल्या शेतकऱ्यांची यादी साखर आयुक्तांकडून मागवावी. तसेच अनुदानाची रक्कम थेट लाभ हस्तांतरण डीबीटी या तत्वावर संबंधित शेतक-यांच्या बँक खात्यात वर्ग करावी.अन्यथा शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानावर कारखानदारच ताव मारतील, अशी शंकाही श्री.शेडगे यांनी व्यक्त केली आहे.
सदरचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार यांचेमार्फत देण्यात आले. या प्रसंगी नायब तहसिलदार अ. श. राजवळ यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नीलेश शेडगे, महिला आघाडीच्या सूनिताताई वानखेडे, नवनाथ दिघे, प्रकाश जाधव, श्रीराम त्रिवेदी, रवी वानखेडे, मधू काकड, मयूर भनगडे आदी शेतकरी उपस्थित होते.







