कृषी विज्ञान केंद्रात खरीप पूर्व प्रशिक्षण
लोणी : खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी आतापासूनच सर्वांनी प्रयत्न करुन येणाऱ्या काळात खत टंचाई आणि बियाणांची टंचाई भासू नये आणि शेतकऱ्यांना बांधावरती तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे या दृष्टीने कृषी विस्तारकांनी प्रयत्न करावे आणि हे प्रयत्न करत असताना नवीन तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्रात ए आय चा वापर वाढवताना येणा-या खरिपामधून शेतकऱ्यांना जास्तीचे उत्पादन कसे मिळेल यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले. पायरेन्सच्या कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर या ठिकाणी उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी विस्ताराकांसाठी खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमात बोराळे बोलत होते. यावेळी केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, राहाता तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे,संगमनेरच्या श्रीमती रेजा बोडखेकोपरगावचे मनोज सोनवणे,केंद्राचे शास्त्रज्ञ शांताराम सोनवणे, डॉ. विलास घुले, डॉ. प्रियंका खर्डे, डॉ. विठ्ठल विखे,सज्जला लांडगे आदींसह संगमनेर विभागातील कृषी विस्तारक उपस्थित होते. यावेळी बोलतांना सुधाकर बोराळे म्हणाले, पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून खरीप पूर्व हंगाम प्रशिक्षणाचे आयोजन वेगवेगळ्या विभागांमध्ये होत आहे. अहिल्यानगर जिल्हा हा कृषी क्षेत्रात आघाडीवर राहावा यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहे. विविध योजना आणि शेतकऱ्यांना खरीप हंगामात वेळेवर निविष्ठा मिळाव्यात यासाठी सर्वांनी प्रयत्न करत असताना कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर त्याचबरोबर कृषी क्षेत्रात होत असलेले बदल आणि ए आय तंत्राचा कार्यक्षमतेने वापर करून शेतीचे उत्पादन वाढीसाठी आपण प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख यांनी मका, सोयाबीन, कापूस, मुग,तुर मिश्र पिक पध्दती आदी पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान यावरती माहिती देऊन नवनवीन वाणांचा वापर करण्याबरोबरच कापूस उत्पादकांनी उत्पादन तंत्रज्ञान समजून घेण्याचे आवाहन केले. केंद्राचे मृद विज्ञान विभागाचे प्रमुख शांताराम सोनवणे यांनी माती परीक्षण, बीज प्रक्रिया आणि एकात्मिक खत नियंत्रण,रोग-किड नियंञण या विषयाची माहिती दिली. डॉ. विलास घुले यांनी भाजीपाला लागवड, फळबाग व्यवस्थापन आणि नवीन फळबाग लागवड याविषयी मार्गदर्शन केले. केंद्राच्या विस्तार विभागाच्या प्रमुख डॉ. प्रियंका खर्डे यांनी गट संघटन आणि एकत्रित बीज उत्पादन, एकत्रित निविष्ठा खरेदी विक्री आणि यांत्रिकीकरणाचा वापर आदी विषयावरती मार्गदर्शन केले कार्यक्रमांमध्ये संगमनेर विभागातील दीडशे कृषी विस्तारक उपस्थित होते. यावेळी कृृृषि विस्तारकांना बीज प्रक्रिया, बियाणे उगवण चाचणी, गांडूळ खत उत्पादन, जिवाणू खतांचा वापर जैविक औषधांचा वापर आदीची माहीती प्रात्यक्षिकांतून देण्यात आली.







