नेवासा : नेवासा पोलीस ठाणे हद्दीत जानेवारी ते एप्रिल २०२६ या चार महिन्यांच्या कालावधीत बेपत्ता व्यक्ती आणि आत्महत्यांच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे ही आकडेवारी केवळ नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने परिस्थितीची गंभीरता अधिक अधोरेखित होत आहे. महिला आणि अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे वाढते प्रमाण नागरिकांमध्ये चिंता निर्माण करत असून पोलिस प्रशासनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.नेवासा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार महिन्यांत एकूण ७५ व्यक्ती बेपत्ता झाल्या असून त्यामध्ये तब्बल ५५ महिला आहेत. अल्पवयीनांमध्ये १३ मुली आणि १ मुलगा बेपत्ता झाला, तर १८ वर्षांवरील ४२ महिला आणि १९ पुरुष बेपत्ता झाल्याची नोंद आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला आणि मुली बेपत्ता होत असताना पोलिसांकडून कोणती विशेष जनजागृती मोहीम राबवली गेली? ग्रामीण भागातील सुरक्षेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे का? असे प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.पोलिसांनी काही व्यक्तींचा शोध घेतला असला तरी अजूनही अनेकांचा ठावठिकाणा लागलेला नाही. उपलब्ध माहितीनुसार ७५ पैकी केवळ ३८ व्यक्ती सापडल्या आहेत. उर्वरित व्यक्तींच्या शोधासाठी नेमकी कोणती मोहीम सुरू आहे? बेपत्ता प्रकरणांमध्ये तपासाची गती वाढवली जाणार का? अल्पवयीन मुलींच्या घटनांमध्ये मानवी तस्करी किंवा इतर कोणते गंभीर प्रकार आहेत का? अशा चर्चांना तालुक्यात उधाण आले आहे.दरम्यान, आत्महत्यांच्या घटनांनीही चिंता वाढवली आहे. चार महिन्यांत २५ आत्महत्यांची नोंद झाली असून त्यात २० पुरुष आणि ५ महिलांचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे १८ वर्षांखालील ४ मुलगे आणि २ मुलींनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. युवकांमधील मानसिक ताण, आर्थिक अडचणी, व्यसनाधीनता, कौटुंबिक वाद आणि नैराश्य वाढत असल्याची चर्चा आहे. मात्र प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा यावर कितपत गंभीर आहे, हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.तालुक्यात वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना, समुपदेशन केंद्रे, शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती मोहीम आणि मानसिक आरोग्यावर विशेष कार्यक्रम राबवण्याची मागणी आता जोर धरत आहे.
नेवासा पोलीस ठाणे हद्दीत बेपत्ता आणि आत्महत्यांच्या घटनांत वाढ; पोलिसांसमोर गंभीर प्रश्न







