बुलढाणा : छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी गुणवंताबाईराजे यांच्या ३७० व्या विवाह सोहळ्याच्या स्मृतीनिमित्त आयोजित “ऐतिहासिक करवंड महोत्सव २०२६” हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने पार पडला. या ऐतिहासिक सोहळ्यास सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते.यावेळी बोलताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले की, “आपण आज केवळ इतिहास वाचत नाही, तर तो प्रत्यक्ष अनुभवत आहोत. ज्या पवित्र भूमीवर हा विवाह सोहळा पार पडला, त्या ठिकाणी उपस्थित राहणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. हा सोहळा आपल्या परंपरा, संस्कृती आणि वैभवाचा जिवंत वारसा आहे.”तसेच त्यांनी राजमाता जिजाऊंच्या कार्याचा विशेष उल्लेख करत, स्वराज्य घडवण्यात त्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. दरम्यान, महाराणी गुणवंताबाई यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी तसेच बावन्नबुरुजी आणि राजवाड्याच्या पुनरुज्जीवनासाठी शासन प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही दिली.पूर्वी छत्रपतींचा इतिहास झाकोळण्याचे प्रयत्न झाले असले तरी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनाने तो व्यापक स्तरावर पुढे आणण्याचे काम केल्याचेही त्यांनी नमूद केले.महाराणी गुणवंताबाईराजे यांच्या विवाह सोहळ्याचा वारसा आजही तितक्याच अभिमानाने जपला जात असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले तसेच या सोहळ्यात महाराणींच्या वंशजांची उपस्थिती हा विशेष सन्मानाचा क्षण ठरल्याचे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमास आमदार श्री. संजय गायकवाड, आमदार सौ. श्वेता महाले, आमदार श्री. मनोज कायंदे, आमदार श्री. सिद्धार्थ खरात, आमदार श्री. धीरज लिंगाडे, श्री. अनिकेत राजे निंबाळकर, माजी आमदार सौ. रेखाताई खेडेकर तसेच हरिचंद्र प्रताप रुद्र इंगळे, शकीलाबाई हरिचंद्र इंगळे (महाराणी गुणवंताबाई इंगळे यांचे वंशज) यांच्यासह विविध मान्यवर, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“पडझड झालेल्या बुरुजांचे पुनरुज्जीवन आणि येथे उभा असलेला ऐतिहासिक राजवाडा पुन्हा जनतेसमोर सजीव स्वरूपात उभा करणे हीच आपली संकल्पना आहे. हा प्रस्ताव शासनाकडे मांडला असून, मा. मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांच्या माध्यमातून या प्रकल्पाला लवकरच मान्यता मिळेल, असा मला ठाम विश्वास आहे. या ठिकाणाला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”- मा. शिवेंद्रसिंह राजे भोसले कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य







