सोनई (प्रतिनिधी): नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे जलजीवन मिशन हर घर जल मिशन अंतर्गत सुरू असलेल्या तलावात बुडून तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तलावाच्या कामकाजातील निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा रजिस्टर क्रमांक १२२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०५, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सुभाष वैजनाथ काळे (वय ४३, रा. न्हावी गल्ली, घोडेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसा योगेश काशीनाथ हिंगणे (रा. बारामती, जि. पुणे) आणि के. के. थोरात (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही, रा. संगमनेर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित आरोपी हे जलजीवन मिशन अंतर्गत घोडेगाव येथील तलाव बांधकामाचे ठेकेदार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
ही दुर्घटना दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी दुपारी ४.३७ वाजण्याच्या सुमारास घडली. घोडेगाव येथील तलावात प्रथमेश सुभाष काळे (वय १७), जिवण रविंद्र आव्हाड (वय १७) आणि शोएब अय्युब शेख (वय १७) हे तिघे मित्र पाण्यात पडून बुडाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, संबंधित तलावाचे बांधकाम वेळेत पूर्ण करण्यात आले नव्हते. तसेच तलाव परिसरात कोणतीही सुरक्षा उपाययोजना—जसे की संरक्षण भिंत, कुंपण, सूचना फलक किंवा सुरक्षा रक्षक—उपलब्ध नव्हते. तलावात कालव्याचे पाणी झिरपत असूनही आवश्यक खबरदारी घेण्यात आलेली नव्हती. शिवाय, तलावालगत वर्दळीचा रस्ता असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.
दरम्यान, मुलाच्या मृत्यूमुळे अंत्यविधी पार पडल्यानंतरच फिर्यादी पोलीस ठाण्यात हजर राहू शकले, त्यामुळे गुन्हा दाखल होण्यास विलंब झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेचा पुढील तपास सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई सुरज पांडुरंग मेढे हे करीत आहेत.
घोडेगावातील जलजीवन मिशन तलाव दुर्घटना तीन तरुण बुडून मृत्यू प्रकरणी अखेर; ठेकेदारांवर गुन्हा दाखल निष्काळजीपणाचा ठपका







