नैसर्गिक शेतीला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लोणी : राहाता तालुक्यात कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या “सत्यमेव जयते फार्मर कप” स्पर्धेअंतर्गत शेतकरी गट बांधणी व नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमांना शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.या उपक्रमासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, उपविभागीय कृषी अधिकारी संगमनेर अक्षय गोसावी तसेच तालुका कृषी अधिकारी राहता आबासाहेब भोरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. पिंपरी निर्मळ येथे “सरस्वती शेतकरी महिला गट” यांच्या पुढाकारातून नैसर्गिक शेतीशाळा अंतर्गत गांडूळ खत निर्मिती प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात महिला व पुरुष सदस्यांनी सामूहिक सहभाग नोंदवत सवाड पद्धतीने गांडूळ खत बेड तयार केला.यावेळी आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक किशोर कडू यांनी गांडूळ खत बेड उभारणीची पद्धत, त्यातील आवश्यक काळजी तसेच गांडूळ खताच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता कशी वाढते याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शेतातील काडी-कचऱ्याचा पुनर्वापर करून सेंद्रिय खत निर्मिती करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित करत रासायनिक खतांचा वापर कमी करण्याचा संदेश दिला.मंडळ कृषी अधिकारी रमेश चोपडे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गांडूळ खत निर्मितीसाठी मिळणाऱ्या संधींची माहिती दिली. “गांडूळ हा शेतकऱ्यांचा खरा मित्र असून जमिनीची सुपीकता आणि उत्पादनक्षमता वाढविण्यात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे,” असे त्यांनी सांगितले.तसेच सहायक कृषी अधिकारी तथा पाणी फाउंडेशन मेन्टर राजेश पऱ्हे यांनी सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेच्या मूल्यांकन निकषांची माहिती देत शेतकऱ्यांना स्पर्धेत अधिक सक्रिय सहभागाचे आवाहन केले.सहाय्यक कृषी अधिकारी जया निमसे यांनी बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक सादर करून त्याचे फायदे स्पष्ट केले, तर पाणी फाउंडेशनचे समन्वयक वैभव गारुडकर यांनी स्पर्धेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन उपस्थितांना समजावून सांगितले.कार्यक्रमाचे नियोजन सरस्वती महिला शेतकरी गटाच्या अध्यक्षा मीनाताई निर्मळ यांनी केले. यावेळी आबा निर्मळ, वनिता निर्मळ, सुवर्णा निर्मळ, माया निर्मळ, सविता निर्मळ, कविता निर्मळ, सुरेखा निर्मळ, गणेश निर्मळ, मोहिनी निर्मळ, रवींद्र निर्मळ, स्वाती निर्मळ यांच्यासह गटातील महिला व शेतकरी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.नैसर्गिक शेती, सेंद्रिय खत निर्मिती आणि शेतकरी संघटन बळकटीकरण या त्रिसूत्रीवर आधारित हा उपक्रम शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्यासाठी महत्त्वाचा ठरत असून सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेमुळे ग्रामीण भागात नव्या कृषी चळवळीला चालना मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.







