अहिल्यानगर : जिल्ह्यातील नेवासा नगरपंचायतीत मुख्याधिकारी श्री निखिल फराटे यांच्या कार्यपद्धतीवरून वाद निर्माण झाला असून नगरसेवक व नगरसेविकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये निवडून आलेल्या सदस्यांनी दिलेल्या निवेदनात मुख्याधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. कार्यभार स्वीकारल्यापासून ते कार्यालयात वेळेवर उपस्थित राहत नसल्याचे तसेच नागरिकांच्या कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे.निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते नेहमी जिल्हाधिकारी कार्यालयात असल्याचे सांगतात; मात्र प्रत्यक्ष चौकशीत तेथेही अनुपस्थित असल्याचे दिसून येते. नगरपंचायतीशी संबंधित माहिती मागितल्यास ती देण्यास टाळाटाळ केली जाते आणि लेखी अर्ज करूनही माहिती दिली जात नसल्याने पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.दरम्यान, २ जानेवारी २०२६ रोजी नगराध्यक्ष पदग्रहण सोहळ्याबाबत सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या पत्रिकेवरूनही वाद निर्माण झाला आहे. या पत्रिकेत मुख्याधिकारी व तहसीलदार यांची नावे छापण्यात आली होती, मात्र नगरसेवकांना अधिकृत निमंत्रण देण्यात आले नव्हते. अनधिकृत पत्रिका प्रसारित करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करूनही कोणतीही कारवाई न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच पाइपलाइन दुरुस्तीवर सात महिन्यांत सुमारे ४० लाख रुपये खर्च झाल्याचे दिसत असताना नागरिकांना पाण्यासाठी सात दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याने आर्थिक गैरव्यवहाराची चर्चा रंगत आहे.मुख्याधिकारी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाचे कामकाज विस्कळीत झाले असून नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यात अडथळे येत आहेत. या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा नागरिकांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला आहे.
नेवासा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांविरोधात नगरसेवकांचा संताप; चौकशीची मागणी







