अहमदपूर – चाकुर मतदारसंघात मन्याड नदीवरील बंधाऱ्यांचे काम अंतिम टप्प्यात; हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार
पोलीस फ्लॅश न्यूज अहमदपूर( गोविंद काळे ) “शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी नाही, तर शेतात पाणी असावे, हीच आमची भूमिका आहे,” अशा शब्दांत राज्याचे सहकारमंत्री तथा आमदार नामदार बाबासाहेब पाटील यांनी आपला विकासकामांचा संकल्प बोलून दाखवला आहे. अहमदपूर-चाकुर मतदारसंघातील मन्याड नदीवर निर्माण होत असलेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांमुळे आता या भागातील शेती नंदनवन होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
पेरणीपूर्वी कामे पूर्ण होण्याचे संकेत मतदारसंघातील कोपरा, सोनखेड, माणखेड, विळेगाव, मावलगाव, चिलखा आणि शेणकुड या गावांच्या नदीपात्रात बंधाऱ्यांचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. यातील बहुतांश कामे अंतिम टप्प्यात असून, पावसाळ्यापूर्वी म्हणजेच पेरणीपर्यंत ही कामे पूर्ण करण्याची सूचना प्रशासनाला देण्यात आली आहे. या कामामुळे या परिसरातील बहुतांश शेतक्षेत्र ओलिताखाली येणार असून, शेतकऱ्यांसाठी हे एक ऐतिहासिक आणि भरीव पाऊल ठरले आहे.
बारमाही शेती आणि आर्थिक क्रांती या कोल्हापुरी बंधाऱ्यांमुळे शेतीक्षेत्र बारमाही पाण्याखाली येणार आहे. परिणामी, शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांऐवजी बागायती शेती आणि नगदी पिकांचे उत्पादन घेणे सहज शक्य होईल. उजना, बेंबडेवाडी, सुमठाणा, गंगाहिपारगा शिवारातील शेतकऱ्यांनी सिंचनामुळे केलेली प्रगती डोळ्यासमोर असताना, आता मन्याड खोऱ्यातील शेतकऱ्यांचेही जीवनमान उंचावणार आहे. शेकडो हेक्टर जमीन सिंचनाखाली आल्यामुळे या भागाच्या आर्थिक विकासाला मोठी गती मिळणार आहे.

अंतेश्वर प्रकल्पाचा ठाम निर्धार
मतदारसंघातील खंडाळी, धसवाडी, ढाळेगाव, अंधोरी, चिखली या गावांची सिंचनाची जुनी मागणी पूर्ण करण्यासाठी नामदार बाबासाहेब पाटील यांनी बहुचर्चित अंतेश्वर प्रकल्पाचे पाणी मतदारसंघात आणण्याचा ठाम निर्धार केला आहे. कोल्हापुरी बंधाऱ्यांमुळे तूर्तास मन्याड खोऱ्याला दिलासा मिळाला असून, अंतेश्वर प्रकल्पामुळे मतदारसंघातील उर्वरित कोरडवाहू भागालाही सुगीचे दिवस येतील.
आमदार बाबासाहेब पाटील यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अहमदपूर-चाकुर मतदारसंघातील बळीराजा सुखावला असून, हा प्रकल्प मन्याड खोऱ्याच्या इतिहासात एक ‘माईलस्टोन’ ठरणार आहे.
“शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी नाही, तर शेतात पाणी असावे, हीच आमची भूमिका आहे. मन्याड खोऱ्यातील हे बंधारे केवळ सिमेंटची बांधकामे नसून ती या भागाच्या समृद्धीची पायाभरणी आहे. अंतेश्वर प्रकल्पासह मतदारसंघातील प्रत्येक इंच जमीन ओलिताखाली आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
— नामदार बाबासाहेब पाटील (सहकारमंत्री, महाराष्ट्र राज्य)











