सोनई : आईवडील हेच पहिले गुरु व खरे दैवत असल्याने वृध्द अवस्थेत त्यांची चिडचिड आणि राग सहन करुन कर्तव्य समजून सेवाभाव जपला पाहिजे. त्यांचा आशिर्वाद असेल तर चारधाम यात्रा सुध्दा करण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या प्रती सेवाभाव व आपुलकी जपली तर त्या घरात निश्चितच कौटुंबिक सौख्य लाभते व भावी पिढीत आईवडिलांच्या प्रती असलेले कर्तव्य रुजले जाते. असे प्रतिपादन सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत उध्दव महाराज मंडलिक यांनी व्यक्त केले.म्हाळसपिंपळगाव (ता.नेवासा) येथील हनुमानवाडी येथील ठोंबरे वस्तीवर बाबासाहेब ठोंबरे परिवाराच्या वतीने रख्माबाई व शहादेव ठोंबरे यांचे मातृ-पितृ पूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित किर्तनात बोलत होते. जेष्ठ किर्तनकार कारभारी महाराज झरेकर, तनपुरे महाराज, नितीन महाराज हरकळ, सचीन महाराज पवार, प्रसाद महाराज तरवडे, राजकीय,सहकार, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. नवनाथ ठोंबरे व भाऊसाहेब ठोंबरे यांनी संतपूजन केले. उपस्थित संत,महंतांचा सत्कार दादासाहेब व रावसाहेब ठोंबरे यांनी केला. शेरणीतुला व अभीष्टचिंतन कार्यक्रम झाला. संदीप कर्डिले यांनी सुत्रसंचालन केले. नवनाथ ठोंबरे यांनी आभार मानले. महाप्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.
म्हाळसपिंपळगावात रख्माबाई व शहादेव ठोंबरे यांचे मातृ-पितृ पूजन उध्दव महाराज मंडलिक यांचे किर्तन







