जलजीवन मिशनच्या कामांना गती देणार ; मंत्रीमहोदयांचे आश्वासन
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांमध्ये येणाऱ्या अडचणींवर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा. गुलाबराव पाटील यांच्यासमवेत आमदार सत्यजीत तांबे यांची आज बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्यातील रखडलेल्या जलजीवन मिशन योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
अहिल्यानगर जिल्ह्यातील तसेच संगमनेर तालुक्यातील देखील विविध गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळूनही प्रत्यक्षात कामे पुढे सरकत नसल्याची वस्तुस्थिती आमदार तांबेंनी मांडली. अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी, प्रशासकीय विलंब आणि समन्वयाचा अभाव यामुळे नागरिकांना अजूनही शुद्ध पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
याबाबत बोलतांना तांबे म्हणाले की, अहिल्यानगर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांमध्ये येणाऱ्या अडचणींवर मी यापूर्वीच दि. ९ जुलै २०२५ रोजी पावसाळी अधिवेशनात सभागृहात आवाज उठवला होता. अनेक ठिकाणी पाईपलाईनचे काम रखडलं आहे, काही ठिकाणी तर वर्क ऑर्डर झाल्यानंतर ही प्रत्यक्ष काम सुरू झालेलं नाही. या विषयावर मी सातत्याने पाठपुरावा करतोय.
आजच्या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील परिस्थिती वास्तववादी पद्धतीने मांडत “पाणी हा मूलभूत प्रश्न आहे याकडे विलंब न करता गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे,” अशी ठाम भूमिका घेतली आहे.
मंत्री गुलाबराव पाटील यांनीही याची दखल घेत अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या. “योजनांच्या अंमलबजावणीत येणारे अडथळे तात्काळ दूर करा आणि कामांना गती द्या,” असे निर्देश देखील दिले आहेत. प्रत्येक योजनेची प्रगती नियमितपणे तपासली जाईल आणि कामात हलगर्जीपणा चालणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या बैठकीस अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आनंद भंडारी यांच्यासह पाणीपुरवठा विभागातील अधिकारी उपस्थित होते.
आमदार सत्यजीत तांबेंमुळे जिल्ह्यातील पाणीप्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी –
“पाणी हा मूलभूत प्रश्न आहे याकडे विलंब न करता गांभीर्याने लक्ष देणे गरजेचं आहे. पुढील काळात काळात जलजीवन मिशन अंतर्गत कामांना वेग मिळून ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आ.तांबे यांनी व्यक्त केली.







