श्रीरामपूर : शहरात उन्हाळ्याची तीव्रता चांगलीच जाणवायला लागली आहे आणि अश्यातच ऐन उन्हाळ्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असताना देखील शहरातील विविध ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळीत तर काही ठिकाणी बंद आहे. हा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने पालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना निवेदन देण्यात आले. भाजपने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, उन्हाची वाढती तीव्रता आणि लाभक्षेत्रात पिण्याच्या पाण्याची निर्माण झालेली टंचाई विचारात घेवून जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी भंडारदरा धरणातून बिगरसिंचनाचे व पिण्याच्या पाण्याचे आवर्तन तातडीने सुरू करण्याच्या सूचना विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्याप्रमाणे आपल्या शहरातून जाणाऱ्या पाट पाण्याच्या आवर्तनांतून श्रीरामपूरकरांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. परंतु तरीदेखील गेल्या दोन, तीन दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे. तर काही भागात पाणी पुरवठा झालेला नाही. त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. यापूर्वी शहरात पाण्याचे नियोजन ही अगदी काटेकोरपणे राबविले जात होते. परंतु आता याचे नियोजन अगदी ढिसाळ झाले असून यातून जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. येणाऱ्या काळवधीत हिंदू परंपरेचे अनेक सन, महापुरुषांची उत्सवाचे विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे या पाणीपुरवठ्यावर पालिका प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करून नागरिकांना दिलासा द्यावा. या निवेदनावर शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, गटनेते वैशाली चव्हाण, जयश्रीताई पाटील, रवी पाटील, दीपक चव्हाण, आशीष धनवटे, स्नेहल खोरे, केतन खोरे, संजय गांगड, सिद्धार्थ फंड, मनोज लबड़े, विशाल अंभोंरे आदींच्या सह्या आहेत.
आजपासून पाणीपुरवठा सुरळीत होणार - मुख्याधिकारी शहरातील तळ्याचे काम सुरू असून, त्यातील गाळ काढणे, झाडे काढणे हे काम चालू असल्यामुळे तळ्यातून पाणीपुरवठा करता आला नाही. तळ्यात असलेले फ़िल्टर हे खराब झाल्यामुळे ते दुरुस्ती करण्यासाठी वेळ लागल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. परांतू आता सगळे काम पूर्ण केले असून उद्यापासून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी सांगितले.सदर बातमीस प्रसिद्धी मिळावी, ही विनंती जितेंद्र छाजेड शहराध्यक्ष - भाजपा श्रीरामपूर.







