सोनगाव :राहाता तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोल्हार भगवतीपुर येथे ‘कुसुमाग्रज वाचन अभियान’ अंतर्गत सुरू असलेल्या ‘श्यामची आई’ कथामालेने विद्यार्थ्यांच्या मनात संस्कारांचा जागर घडवला आहे. केवळ पुस्तकी शिक्षण न देता मूल्याधिष्ठित शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या या शाळेने समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे.
मुख्याध्यापक श्री. साहेबराव अनाप यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज परिपाठात ‘श्यामची आई’ या अमर साहित्यकृतीतील कथांचे वाचन केले जाते. शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि विद्यार्थ्यांचा जिव्हाळ्याचा प्रतिसाद यामुळे हा उपक्रम शाळेच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. श्रीमती सविता कडलग, राजेंद्र बोकंद, हौशीनाथ सजन, श्रीमती विद्याताई उदावंत, श्रीमती मनीषा शिंदे, श्रीमती शितल देशमुख, श्रीमती लता गाडेकर, श्रीमती रूपाली नाईक आणि पुंडलिक महाले यांनी कथावाचनातून विद्यार्थ्यांच्या मनात मूल्यांची पेरणी केली आहे.
‘श्यामची आई’च्या कथांमधून प्रामाणिकपणा, शिस्त, कर्तव्यनिष्ठा, माणुसकी, बंधुभाव आणि सहकार्य यांसारख्या जीवनमूल्यांचा प्रभावी संस्कार विद्यार्थ्यांवर होत आहे. मोठ्यांचा आदर, प्राणीमात्रांबद्दल प्रेम, मैत्रीभाव आणि समाजाभिमुखता यांसारखे गुण विद्यार्थ्यांच्या वर्तनातून स्पष्ट दिसू लागले आहेत.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढत असून ऐकण्याची सवय, विचारशक्ती, कल्पनाशक्ती आणि अभिव्यक्ती कौशल्य यांचा विकास होत आहे. कथा ऐकल्यानंतर विद्यार्थी निर्भयपणे आपले विचार मांडू लागले असून त्यांच्या आत्मविश्वासातही लक्षणीय वाढ झाल्याचे शिक्षकांनी सांगितले.
विशेष म्हणजे, हा उपक्रम केवळ कथावाचनापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व घडणीचा भक्कम पाया ठरत आहे. शिक्षकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे आणि मुख्याध्यापकांच्या प्रभावी नेतृत्वामुळे हा उपक्रम संस्कारक्षम आणि प्रेरणादायी ठरला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये होत असलेला सकारात्मक बदल पाहून पालकांनी समाधान व्यक्त केले असून शाळेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी संघ आणि विविध समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांचे अभिनंदन करत हा उपक्रम राज्यातील इतर शाळांसाठीही मार्गदर्शक ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
श्यामची आई’ कथामालेतून संस्कारांचा जागर; कोल्हार भगवतीपुर शाळेचा आदर्श उपक्रम!







